Saturday, 20 November 2021

मेळघाट मेळ+घाट

 

 

                     


मेळघाटला जाण्यासाठी कोलकाता मेल पकडायला मी सीएसटीला पोचले तेव्हा एक माणूस मला भेटायला स्टेशनवर येणार आणि प्रवासासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट आणून देणार हे माझ्या पक्कं डोक्यात होतं. पण इतर चार सहप्रवासी भेटल्यावर मात्र गप्पांच्या नादात ही गोष्ट मी पूर्णपणे विसरून गेले. गाडीची वेळ होती रात्री साडेनऊची. आणि कधी नव्हे ते गाडी अगदी वेळेवरही होती. ९.२२ ला माझी ट्यूब पेटली की, अरेच्या, या माणसाचा अजून फोन कसा नाही आला? फोन बघितला तर काय – फोन एरोप्लेन मोडवर गेलेला. झटपट फोनाफोनी केली तेव्हा कळलं की तो माणूस बिचारा मला शोधत प्लॅटफॉर्मवर येरझार्‍या घालतो आहे. मी डब्यातून बाहेर डोकावले, सुदैवाने तो माणूस जवळच होता आणि ती वस्तू माझ्या ताब्यात आली. आणि घोळ होता होता वाचलं. पण पुढे ‘ घोळ होता होता जमलेला मेळ ‘ हेच आमच्या अख्ख्या मेळघाटच्या ट्रीपचं सूत्र बनलं.

मिनिटाचाही उशीर न करता आमची गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे खांडवा स्टेशनात पोचली. आम्हाला घ्यायला श्री. हळबेकाकांनी दोन तरुण, तडफदार कार्यकर्ते पाठवले होते – ऋषिकेश आणि मयूर. त्या दोघा तरुणांना आम्ही नक्की कोणत्या बोगीत आहोत, कितीजण आहोत, आमची नावं काय वगैरे काहीच माहिती मिळालेली नव्हती. आणि तरीही ती दोघंजण बरोबर आमच्या बोगीच्या दारातच आमच्या  स्वागताला हजर होती. स्टेशनबाहेरील जवळच्याच एका टपरीत गरमागरम चहा घेऊन आम्ही सगळे टेम्पो ट्रॅव्हलरने धारणीच्या दिशेने निघालो. आधी साधारण कल्पना होती की या भागात मोबाईल नेटवर्क मिळण्याचा त्रास होईल. पण धारणीच्यापुढे दिवसभर नेटवर्क नसणे आणि त्यातून मार्ग काढत उद्दिष्ट्ये साध्य करणे किती , संयम कसाला लावणारे आणि जिकिरीचे असते याचा पदोपदी प्रत्यय येत गेला.

धरणीला पोचल्यावर मस्तपैकी नाश्तापाणी करून आम्ही निघालो. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात शिरून आम्ही कोल्लूपूरला डॉ. रविंद्र आणि डॉ.स्मिता कोल्हे यांच्या राहत्या घरी जाऊन पोचलो. 



हे दाम्पत्य घरी नव्हते. पण सूनबाईंनी स्वागत केले. आमच्या ऋषिकेशने त्यांच्या प्रकल्पाची इत्थंभूत माहिती दिली. मेळघाटात आरोग्यसेवा पुरविण्यासाठी कोल्हे दाम्पत्य इथे आले. अत्यंत कष्टाने त्यांनी इथे कार्य केले. आरोग्यसेवा पुरवताना आदिवासींना शेतीविषयक मूलभूत ज्ञानाची, कसदार बियाण्यांची माहिती पुरवणे अत्यंत गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आले. आणि मग त्यातच संशोधन करून आज ते कित्येक एकर जमिनीवर बीजशेती फुलवत आहेत. आदिवासींना मार्गदर्शन करीत आहेत.

तिथून आम्ही निघालो ते लवादा या गावी. येथील संपूर्ण बांबू केंद्र ही मेळघाटची खासियत आहे.  श्री. सुनीलभाऊ देशपांडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. निरुपमा देशपांडे हे असेच ध्येयवेडे दाम्पत्य. नागपूरहून मेळघाटात आले. या अविकसित भागातील समाजाच्या आपण कोणत्या पद्धतीने उपयोगी पडू हे चाचपताना त्यांना बांबूच्या संकल्पनेने झपाटले. आणि त्यांनी या कामाला सुरुवात केली. आता येथे बांबूकामाच्या प्रशिक्षणाचे वर्ग चालतात. बांबूच्या विविध जातींवर संशोधन चालते. बांबूची मोठ्या प्रमाणावर लागवड करणे, स्थानिक लोकांना कारागिरी शिकवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे याचा प्रयत्न ही संस्था करत आहे.  बांबूपासून अनेकविध वस्तू बनवण्याचा उपक्रम चालतात. त्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण काम करतात.



 गोष्टीवेल्हाळ सुनीलभाऊंच्या समवेत इथल्या  रुचकर भोजनाचा आनंद अवर्णनीय होता.






मेळघाटातील धारणी तालुक्यातील उतावळी येथे सेवाग्राम ट्रस्ट वर्धा यांच्या तर्फे एक रुग्णालय चालवण्यात येते त्याचं नाव आहे महात्मा गांधी आदिवासी दवाखाना – माता आणि शिशु रुग्णालय. सध्या भाड्याच्या जागेत तुटपुंज्या सोयींमध्ये हे रुग्णालय चालू आहे. पण सेवाग्राम ट्रस्टचे एक विश्वस्त आणि आमचे हळबेकाका यांच्या पाठबळामुळे या जागेपासून जवळच सात एकर जागेवर  एका multy speciality आणि अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी जवळ जवळ पूर्ण झाली असून लवकरच ते कार्यरत होईल. सध्या ५० खाटांची सोय असली तरी भविष्यात १५० खाटांची सोय होणार आहे. गांधीवादी वृत्तीच्या आणि धडाडीच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शकुंतला छाब्रा यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णालयाची उभारणी झाली आहे.










मेळघाटासारख्या दुर्गम आणि अविकसित भागात समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या या मंडळींचं कौतुक करावं तेवढं थोडंच. मेळघाटात ऐंशी टक्के जनता आदिवासी आहे. वाहतुकीची अपुरी साधनं, अनियमित वीजपुरवठा, संपर्काच्या साधनांमध्ये असणाऱ्या त्रुटी, टोकाचं हवामान, करमणुकीच्या साधनांचा अभाव, अपुऱ्या शैक्षणिक सुविधा दैनंदिन गरजाही भागविण्याच्या बाबतीतील मर्यादा यामुळे डॉक्टर मंडळी येथे येण्यास तयार नसतात. या असुविधांमुळे हा भाग मागास राहिला आहे, कुपोषित राहिला आहे. ज्यांना मनापासून काम करायचं आहे त्यांच्यासाठी खरं तर मेळघाट हे मोठे आव्हान आहे.          

त्यानंतर आमचे बस्तान कोलकास येथील फॉरेस्ट रेस्ट हाऊसमध्ये नेऊन बसवले. सिपना नदीच्या एका सुंदरशा वळणावर एका उंच जागी हे रेस्ट हाऊस बांधण्यात आले आहे.  तेथून दिसणारा नदीचा वळणदार प्रवाह आणि सूर्योदय दोन्ही दृश्ये अप्रतिम होती. 









आता माजी पंतप्रधान कै. इंदिरा गांधी जिथे राहून गेल्या त्या जागेत आम्ही राहतोय म्हटल्यावर आमची चैनच होणार असं गृहित धरलेल्या आम्हाला एकेक झटके बसत गेले. वीजेचे भारनियमन तर होतेच. पण मोटार बंद पडल्याने नळाला पाणी नव्हते. पाण्याच्या तुटवड्याची आम्हा मुंबईकरांना काय कल्पना ! असो.



 आम्ही बरोबर भरपूर खाद्यपदार्थ घेतले होते. रात्री निजानीज झाल्यावर आणि भार नियमन सुरु झाल्यावर मूषकमामांना खमंग सुवास आला नसता तरच नवल. सर्व खोल्यांमध्ये त्यांची दिवाळी सुरु झाली. ज्या दोघींना त्यांची खरी भीती आणि किळस त्यांच्या खोलीत तर त्यांनी अक्षरशः नंगा नाच घातला. असो पण त्याही परिस्थितीत आम्ही विविध – आणि विचित्र – वयोगटाचे आणि  पार्श्वभूमीचे पाच सहल भिडू एकदम मजेत आणि कमालीच्या आनंदात होतो.













पाहिल्याच दिवशी आम्ही संध्याकाळी पिली गावात आदिवासींची नृत्ये बघायला गेलो. गावात दुर्गोत्सव चालू होता आणि दोन गावातील चमूंनी आम्हाला त्यांच्या झिंग आणणाऱ्या घुंगुर. चिपळ्या, ढोलावरील बोलांच्या तालात ओढून नेलं. कोरकू आणि भिलाला आदिवासीची नृत्ये होती ती. मी तर थिरकत होतेच. पण हो नाही करत ६९ वर्षांची सुनीति आणि तिची ३५ वर्षांची क्षिप्रा यांनीही रिंगणात उतरून फेर  धरला. मग राजश्रीलाही दोन पावलं टाकायचा मोह आवरता आला नाही. 







आमच्यातला एकुलता एक पुरुष फ्रँकलिन मात्र या साहसाच्या नादी लागला नाही.

मेळघाटात फिरायला येताना दोन उद्देश होते. एक म्हणजे सातपुड्यातील हे जंगल जितक्या जवळून आणि मोकळेपणाने अनुभवता येईल ते पाहणं आणि दुसरं म्हणजे कुपोषणासाठी आणि दुर्गमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या मेळघाटात चाललेली जेवढी जमतील तेवढी सामाजिक कार्ये बघणं. आणि जमलं तर गड किल्ले पाहणं या कार्यक्रमात घुसवायचा अंतःस्थ हेतू होताच. 



मेळघाटात वाघ आणि इतर प्राणी बघायला मिळणार की नाही ही उत्सुकता होतीच. पण  ज्यांना जंगल आवडतं त्यांना जंगलाचा नुसता वाससुद्धा आनंदित करून सोडतो. मेळघाटचं जंगल हे एकाच प्रकारचं आहे. ब्रिटिशांच्या काळापासून करण्यात आलेली सागाची पद्धतशीर लागवड आणि इतर झाडांची कत्तल यामुळे बाह्य जंगलात फक्त सागाचेच साम्राज्य दिसते. कोरकू भाषेत सिपना म्हणजे साग. म्हणून या नदीचे नाव सिपना. 

जंगलातील आमची पहिली पायी भटकंती होती ती भोला नावाच्या अत्यंत तल्लख अशा गाईडसोबत. निघाल्या निघाल्याच धनेशच्या ( हॉर्नबिलच्या ) आवाजाने माझे कान टवकारले गेले. भोला त्याचा माग काढत निघाला आणि लक्षात आलं की एक दोन नाही तर चांगले चार पाच काळे पांढरे धनेश तिथे आहेत.


 त्यांची पुढे पुढे जाणारी पकडापकडी बघत आम्ही पुढे निघालो. नदीच्या काठावर येईपर्यंत आम्हाला पल्लवपुच्छ कोतवाल ( racket tail drongo ), टका चोर ( rufus treepie ),  हळद्या ( oriole ) यांचेही दर्शन झाले. पुढे गुडघाभर पाण्यातून नदी पार करावी लागणार होती. मग त्या गुळगुळीत निसरड्या गोट्यांवरून ( ही सिपना नदी पुढे नर्मदेला जाऊन मिळते ) तोल सांभाळत हे दिव्य पार पडले. तेवढ्यात लक्ष गेलं ते पात्राच्या काठाशी असलेल्या वाळक्या फांदीवर बसलेल्या खंड्या पक्ष्याकडे ( common Kingfisher ). त्याने आपलं सावज चोचीत पकडून झटके देत खायला सुरुवात केली होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्याच्या पंखावरची चकाकी, मासा चोचीत धरून त्याला मारून खायची त्याची लगबग आणि नंतर पोट भरल्यावर दिमाखात आजूबाजूला नजर फिरवणं – सगळंच लई भारी. इवलासा जीव पण काय त्याचा तोरा आणि काय त्याची नजाकत.... लाजवाब !





हवेतला गारवा कमी व्हायला लागला तशी फुलपाखरांची शाळा भरायला लागली. त्यातली baronet जातीची फुलपाखरं तर आमचे वाटाडे असल्यासारखी आमच्या पुढे धावत होती. दोन प्रकारचे सुतार पक्षी आणि माझ्यासाठी पर्वणी ठरलेला शिलिंद्री (  Velvet Fronted nuthatch ) हे या ट्रेलचे आणखी काही खास क्षण. 





ट्रेल संपणार होती एका हमरस्त्यावर जिथे आमची ट्रॅव्हलर आमची वाट पहात उभी असणार होती. उन चढत चाललं होतं. ज्येष्ठ मंडळींना थकवा जाणवायला लागलेला असतानाच आम्ही हमरस्त्यावर पोचलो. आता हुश्श म्हणून बसावं म्हटलं पण लक्षात आलं की आपली गाडी नव्हतीच तिथं. घोळ सुरु.... मग थोडा वेळ वाट पाहू, ... एखाद्या येणाऱ्या  वाहनाबरोबर सेमाडोहला जाऊ म्हणेतो ट्रॅव्हलर तिथे दाखल झाली.  ... आणि मेळ जमला.


ग्रामीण भागातील आठवडी बाजार बघणे ही मजा काही औरच असते. चौकशी केली तेव्हा कळलं की एक दिवस हरिसालच्या बाजारात आम्हाला एक तास घालवता येणं शक्य आहे म्हणून. मग सकाळी भरपेट झालेल्या नाश्ताच्या शिदोरीवर भरवसा ठेवत दुपारच्या जेवणाला चाट मारून आम्ही ऐन दुपारी बाजारात दाखल झालो. मस्त रंगीबेरंगी प्लास्टिकची पालं लावलेली विविध प्रकारच्या अन्नधान्याची दुकानं, मिठाईची दुकानं, तसेच प्लास्टिकच्या खेळण्यांची आणि बहुविध उपयोगी वस्तूंची दुकानं यांनी बाजार फुलला होता. चकाकणाऱ्या चांदीच्या खास मेळघाटी दागिन्यांच्या दुकानांकडे आमची पावलं न वळती तरच नवल. पण नंतर ते ठसठशीत दागिने घेण्याची आपली ऐपत नाही हे ओळखून अंगठीसारखी वापरता येणारी जोडवी, नाजुकसे पैंजण घेऊन आम्ही मोकळे झालो.












 दुपारी आमचा जंगल गाईड भोला आम्हाला हरिसाललाच भेटणं अपेक्षित होतं. पण निरोप असा मिळाला की तो कोलकासला आमच्या रेस्ट हाऊसवर आम्हाला भेटणार आहे.

 पण भोलाला घेण्यासाठी आम्ही दवाखान्यात न जाता रेस्ट हाउसला गेलो तर निरोप मिळाला की भोला सेमाडोहच्या गेटवर भेटणार आहे म्हणून. अरेच्या ! जसा निरोप मिळेल तशी आमची वरात इकडून तिकडे फिरत होती. तिथे पोचल्यावर कळलं की जंगलात याच दिशेने प्रवेश करायचा आहे म्हणून. माझ्या विशेष आग्रहामुळे उघड्या जिप्सीतून सफारी होणार होती. ती आली आणि आम्ही दुपारच्या सफारीला निघालो. पाच एक कि.मी. गेलो असू नसू ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि तो तिची पाहणी करू लागला. म्हणाला, “ लाफा का ( पाट्याचे ) वेल्डिंग निकाल आया है. यह गाडी अंदर नाही लेके जा सकते है. “ झालं. गाडी परत फिरून सेमाडोहच्या तिठ्यावर आली. सुदैवाने दुसरी जिप्सी लवकरच मिळाली. तिच्या सीट्स आणि एकूण अवस्था चांगली वाटल्याने आम्ही म्हणालो, “ जो होतं है वह अच्छे के लिये ही होता है. “ या सगळ्या घोळात सफारी सुरु व्हायला तासभर तरी उशीर झाला होता. पण शिरलो एकदाचे आत. विविध पक्षी आणि फुलपाखरांच्या छायाचित्रणाचे प्रयत्न सुरु होते. तेवढ्यात भोलाने एका जागी गाडी थांबवायला सांगितली आणि तो झाडांचे शेंडे आणि खोडं निरखू लागला. ‘ फॉरेस्ट आऊलेट दिख सकता है ‘ म्हणाला. फॉरेस्ट आऊलेट म्हणजे ठिपक्यांचा जंगली पिंगळा. हे लहानगे पांढऱ्या भुवयावाले घुबड फक्त मेळघाटच्याच जंगलात सापडते. तेव्हा एक दुर्मीळ दर्शन होणार अशी अशा पालवली. आणि ते दिसलेही. भोलाच्या तल्लख नजरेला झाडांच्या गर्दीत ते बरोबर टिपता आले. त्याने त्याची जागा मला समजावून सांगेपर्यंत ते उडून आमच्या मागच्या झाडावर लांब जाऊन बसले. 




माझी पूर्ण झूम वापरून शक्य ते शॉट्स मी घेऊन ठेवले.










पुढच्या फेरीत आम्हाला काही गवे दिसले.







 साधारण तासाभराने आम्ही दुसरी वाट पकडली. तोपर्यंत लक्षात आलं होतं की गाडी चढ नीट चढत नाहीये. आणि मग काय --- संध्याकाळी पाचच्या सुमारास घनदाट जंगलाच्या ऐन मध्यभागी आमची गाडी बंद पडली. तपासानंतर कळले की गाडीने सर्व पेट्रोल पिऊन टाकले आहे. घोळ अनुभवातील सरताज घोळ सुरु झाला होता. मेळघाटमध्ये कुठेही मोबाईल रेंज मिळवणे हे एक मोठे दिव्य आहे हे तर खरेच. पण येथे पेट्रोल उपलब्ध असणे हीही तितकीच अडचणीची गोष्ट आहे. छोट्या गावांच्या समुहात पेट्रोल पंपच नाहीत. पार मोठ्या गावात जावं लागतं त्यासाठी. इथले पेट्रोलचे व्यवहार  कॅनच्या पुरवठ्यावरच अवलंबून असतात.

भोलाला आता फारच अपराध्यासारखं वाटू लागलं. आता काय करायचं याचा पाच मिनिटे विचार करून तो म्हणाला, “ मैं जहां पे रेंज मिलेगी वहां तक जा के पेट्रोल मंगवाता हूँ. घंटेभरमें आ जाऊंगा. “ पठ्ठा जंगल तुडवत धावत निघाला की टेकडीच्या माथ्याकडे. दोन टेकड्या पार केल्यावर त्याला रेंज मिळाली. निरोप देऊन तो पुढे तसाच जंगल तुडवत रस्त्यावर येऊन पोचला आणि पेट्रोलचा कॅन घेऊन येणाऱ्या माणसाबरोबरच आमच्यापर्यंत येऊन पोचला. या सर्व द्राविडी प्राणायामात एक दीड तास गेला होता. बरं, इथे आम्ही काय करत होतो ? जंगल सफारीत जे कधीही करू देत नाहीत ते म्हणजे गाडीतून खाली उतरणे. पण आम्ही खाली उतरून जरा पाय मोकळे केले. बराच वेळ थोपवून ठेवलेले नैसर्गिक विधीही जंगलार्पण केले. गोरजमुहुर्त गाठला होता, त्यामुळे फुलपाखरंही झोपण्यासाठी पानांच्या आड दडू लागली आणि आमच्या कॅमेरात बंदिस्त झाली. 



गप्पा तर चालूच होत्या. अंधारु लागलं होतं. रात्र झाली आणि पेट्रोल आलं नाही तर काय याचा विचार करून झाला. थोडंफार सरपणही गोळा करून ठेवलं. गंमत म्हणजे आम्ही सगळेच डोंगरभटके असल्यामुळे प्रत्येकाच्या पोतडीत तहान लाडू -भूक लाडू होतेच. टॉर्च होते. त्याही परिस्थितीत कोणीही टेन्शनमध्ये नव्हतं. उलट थट्टा मस्करी, विनोदच चालू होते. – आणि एवढ्यात एकदाचा भोला पेट्रोल घेऊन  आला. गाडीत पेट्रोल भरून आमची  जंगल सफारी परत सुरु झाली. टॉर्च असल्यामुळे रात्रीच्या सफारीचाही (नाईटट्रेल) अनुभव मिळाला.


      अशातच ऋषिकेशने सर्वांना एक कोडं घातलं की आपल्याला आता एक सरप्राईज आहे म्हणून. प्रत्येकजण आपापला कल्पनाविलास लढवू लागला. मला मात्र दुपारपासूनचा कार्यक्रम आठवत होता आणि एक मिसिंग लिंक लक्षात आली होती.  भौगोलिक रचना अशी की पूर्वेकडे कोलकास, त्याच्या पश्चिमेला उतावळीचा दवाखाना आणि त्याच्याही पश्चिमेला हरिसाल. मूळ योजनेनुसार आम्ही हरिसालचा बाजार फिरून त्याच दिशेला असलेल्या जंगलात भ्रमंती करायची आणि नंतर वाटेत दवाखान्याच्या कॅन्टीनमध्ये रात्री खिचडी-कढी खाऊन रेस्ट हाउसला परतायचं असं ठरलं होतं.

आमच्या मूळ योजनेप्रमाणे आम्ही उतावळीच्या रुग्णालयात जेवणार होतो. आणि या क्षणी मात्र आम्ही अगदी विरुद्ध दिशेला होतो. रुग्णालयात पोचू शकणार नव्हतो. रेस्ट हाऊसमध्ये जेवण नव्हतं. मयुरशी काही केल्या संपर्क होऊ शकत नव्हता. म्हणजेच आम्ही दुपारी जेवणाला चाट मारली आणि आता आमच्यावर चाट होण्याची पाळी आली होती. तसेच रेस्ट हाऊसवर पोचलो . अपेक्षा अशी होती की मयूर डबे घेऊन आमची तिथे वाट पहात असणार. भुका लागल्या होत्या. दहा वाजले, साडेदहा वाजले. शेवटी नाईलाजाने आमच्या पोतडीतला कोरडा फराळ पोटात ढकलून आम्ही झोपायला गेलो. आणि अकरा वाजता मयूर मोठ मोठाले डबे घेऊन रेस्ट हाऊसवर अवतरला. त्याचा चेहराच सांगत होता की भरपूर घोळ घालून कशीबशी व्यवस्था करून तो आला होता. त्याला बरे वाटावे म्हणून आम्ही तिघांनी चार घास खाल्ले आणि पलंगाला पाठ टेकली.

दुसऱ्या दिवशी अगदी पहाटेच सफारी सुरु केली, अगदी वेळेवर. या खेपेला आम्हाला ठिपक्यांच्या जंगली पिंगळ्याचे छान मनासारखे शॉट्स मिळाले. 





पावसाळा नुकताच संपला असल्याने जंगलामध्येही भरगच्च हिरवाई दिसत होती. जमीन दिसतच नव्हती. त्यामुळे आम्हीही चार पायांच्या प्राण्यांच्या शोधात नव्हतोच. आणि एक सांबर आणि अनेक गवे वगळता ते दिसलेही नाहीत.

पण जंगलात सहजी न दिसणारे झाडचिचू ( tree shrew ) मात्र मस्त निरखता आले. झाडचिचू म्हणजे एक प्रकारची चिचुंद्री. एखाद्या मोठ्या खारी सारखी दिसते ती. 









अगणित जंगली भले मोठे कोळी ( giant wood spiders ) आणि त्यांच्या मोठाल्या नाजूक जाळ्यात सापडलेले कीटक याचा नजाराही बघायला मिळाला. 











एका गवताळ ठिकाणी एक गवा होता. असं वाटलं की तो एकटाच आहे. पण नंतर कळलं की एवढे मोठे हे अगडबंब प्राणी अनेकजण असून ही त्या गवताच्या जंजाळात बेमालूमपणे लपून बसले आहेत. एकेक करत त्यातले काही गवे उठले आणि एका राजबिंड्या तांबूस गव्याने आमच्या समोरच रस्ता पार केला. सकाळच्या उन्हात त्याची तुकतुकीत काळी शिंगे, पाठीवरची थिरकणारी काळी तांबूस लव, पांढरे मोजे घातलेले पाय आणि दमदार पावलं डौलात टाकत पुढे जाणारा तो गवा .... या अशा क्षणांसाठी तर आपण येतो इथे.

शेवटच्या दिवशी रात्री पूर्व कोजागिरी साजरी करायची कल्पना ऋषिकेशने मांडली आणि आमचे बस्तान वरच्या रेस्ट हाऊसमधून खालच्या रेस्ट हाऊसमध्ये हलले.










समोरच्या हिरवळीजवळ शेकोटी पेटवून द्वादशीच्या चंद्राच्या साक्षीने आम्ही मनसोक्त गाणी म्हटली. शेकोटीवर दूध तापवून ( तेही सहजगत्या उपलब्ध झाले नव्हतेच. घोळाशिवाय असा कार्यक्रम पूर्ण कसा होणार? ) ते प्यायला स्टीलची बाटली वापरून कोजागिरी साजरी झाली.


या घोळातही अशा या रम्य रात्री आम्हाला एक झकास सरप्राईज् मिळायचं होतं. नेहमीप्रमाणे मी माझ्या प्रखर टॉर्चचा झोत झाडांवर टाकून घुबड किंवा तत्सम प्राणी दिसतात का हे पहात होते. आणि काय आश्चर्य – सुरूच्या झाडावर दोन डोळे चमकले की. याहू ! घुबड आहे तर. थोडं निरखल्यानंतर लक्षात आलं की की जे काही आहे ते चार पायांवर फांदीवर चालतंय, त्याला झुबकेदार शेपटी आहे, त्रिकोणी कान आहेत. आम्हाला मटका लागला होता. ती होती उडती खार – Indian giant flying squiral. आणि गंमत म्हणजे आजूबाजूला शोधल्यावर आम्हाला एकूण


तीन उडत्या खारी बघायला मिळाल्या. 



अगदी तरुण तुर्कांच्या स्टाईलमध्ये आम्ही एकमेकांना यस्स असं म्हटलं. फोटो काढण्याचे काही क्षीण प्रयत्नही केले. सहलीच्या शेवटच्या रात्री उडत्या खारीच्या दर्शनाने, दुग्ध प्राशनाने आणि टिपूर चांदण्यामुळे तृप्त होत गाढ झोपी गेलो.

शेवटच्या टप्प्यात आम्ही मेळघाटातील चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणापासून जवळच गाविल गड हा प्रशस्त किल्ला बघितला . तसेच बुऱ्हाणपूर नामक एक ऐतिहासिक शहर आहे. शहाजहानचे सासर. ताजमहाल बांधून होईतोवर मुमताज बेगमचे शव येथील एका कबरीत ठेवण्यात आले होते. तिथेही आशीरगड नावाचा किल्ला आहे. तिथे हि जाऊन आलो पण त्याबद्दल परत कधीतरी.

                                                                  ----- जुई खोपकर 









Monday, 18 January 2021

पहिली एकल  सायकल सफर 


   


  पहाटेचा कुरकुरीत गारवा नाकातून आत शिरू पाहत होता , कानात घातलेले हेडफोन्स हळुवार आवाजात रफीचा मधाळ आवाज  ऐकवत होते . मोबाइल मधल्या ऍपच  माझी रपेट मोजण्याचं काम चोखपणे सुरु  होते. 

पाय त्यांची गती शोधून पेडल फिरवत होते आणि मी स्वतःवरच खुश होऊन एका नव्या साहसाला सुरुवात केल्याच्या आनंदात गुणगुणत होते. 

उरणच्या रस्त्यावर नव्यानेच उभारलेल्या शिवाजीमहाराज आणि समर्थ रामदास यांच्या आकर्षक पुतळ्यापाशी सकाळचा पहिला फोटो घेतला आणि विचार करायला लागले. 


संथ शांत असे जास्त  दिवस गेले कि माझ्या डोक्यात कीडा  वळवळायला लागतो . शरीराला कष्ट देणारं  साहस करायला जीव फुरफुरायला लागतो. 

या वर्षी ख्रिसमसची सुट्टी हलके फुलके काही गड चढून साजरी करावी असा मूळ प्लॅन होता पण मंडळी गळल्यामुळे  तो बारगळला आणि २०२१ मध्ये करायचा सोलो सायकलिंग चा बेत आत्ताच करायचा विचार सुरु झाला.


 परिसराचा आनंद घेत सायकलिंग करायचे असेल तर कोकण रस्त्यासारखे रस्ते नाहीत. इथे झूम झूम जाणाऱ्या गाड्या नाहीत , धूर ओकणाऱ्या ट्रक्स च्या रांगा नाहीत आणि चटके देणारे ऊन सुद्धा मोठ्या हमरस्त्यापेक्षा कमी. 

अनुभवी मित्रांशी चर्चा करून मी माझा रूट  सेट केला. सायकलची  गंजलेली चेन आणि सटकणारे गियर इंदरकडून नीट करून घेतले. 

 पॅनीयरच्या   ( कॅरियर ला अडकवता येण्याजोगी  सामान नेण्यासाठी बॅग  )  दोन बॅग मध्ये माझे अगदी मोजके कपडे , स्वच्छता आणि वैद्यकीय गरजेच्या गोष्टी पॅक केल्या. प्रवासात खाण्यासाठी चणे दाणे , खजूर , tang  आणि ज्यादा पाणीही  घेतलं.  पंक्चर  किट आणि हवा भरायचा पंप  सोबत ठेवला होता. वाटेत कुठे झालंच  पंक्चर  तर  पंक्चर कस काढायचं हे शिकून घेतलं होतं . हॅन्डल बार ला एक पाऊच होता त्यात पैसे , गॉगल केस आणि कॅनन sx ५० कॅमेरा बरोबर घेतला होता. बारच्या उजवीकडे हेडलाईट आणि मागच्या बारला टेल लाईट लावला. तशी खरतर दिवसाउजेडीच सायकल चालवणार होते पण लाईट्स निदान पहाटे तरी नक्कीच आवश्यक असणार होते. 
हेल्मेट , ग्लोव्हस रिफ्लेक्टिव्ह जॅकेट सायकलिंग शॉर्ट्स आणि आत पावलांपर्यंत  येणारी स्लॅकस्  असा माझा वेष असणार होता. 





  मुळात  स्वतःच्या धुंदीत सायकल चालवायला आपल्याला आवडतंय हे लक्षात आलं होतं पण जास्त लांबीचा सलग प्रवास मी अजून एकटीने केला नव्हता.  ते आता घडणार होते.  

सीबीडी बेलापूर ते थळ 
   २३ डिसेम्बरला सकाळी ६.45 ला सायकलवर टांग मारली तेंव्हा  हवा मस्त गारेगार होती. रस्ता माहितीचा होता. तरी  मधला नवीन ब्रिजेस चा घोळ झालाच. बरेच उलट सुलट मार्ग काढून

मी एकदाची करंजा जेटीच्या रस्त्याला लागले.


  जेट्टी वर पोचले तेंव्हा जेमतेम ९ वाजले होते. आणि बोट आलीच. सायकल आत चढवून मी वरच्या डेकवर गेले. 



.
चौफेर पसरलेला समुद्र आणि सीगल्स च्या सुळकांड्या बघत रेवस चा काठ गाठला. 












इथून पुढचा रस्ता छान हिरवाईतून  होता.  आधी कांदळवनांच्या मधून आणि मग रस्त्यालगत च्या दोन्ही बाजूंच्या घनदाट सावली देणाऱ्या झाडांमधून वाट अलिबाग च्या दिशेला जाते . माझी शोधक नजर आकाशात , झुडुपात ,झाडात लपलेले पक्षी शोधत राही. एका तळ्यात पेंटेड स्टोर्क चा थवा सापडला . एका झुडुपा आड सायकल लावून त्यांना दिसणार नाही या बेताने पुढे होत त्यांचे थोडे फोटो काढले.

















पुढे मांडवा बीच लागला , फारशी वर्दळ नसलेला बीच. प्रत्येक अलिबाग सफरीत इथे काही क्षण नयनसुख घेतल्याशिवाय पुढे जाववत नाही.


थोडं पुढे गेल्यावर एका झाडाच्या फांदीवर पसरलेले पंख सावरत एक मोठा पक्षी स्थिरावलेला दिसला .  काहीतरी विशेष मिळणार हे जाणवलं. चटकन सायकल लावून मी कॅमेरा काढला आणि झूम करून चक्क एक मोहोळ घार  oriental honey buzzard  कॅमेऱ्यात टिपली. एका दगडात दोन पक्षी च्या चालीवर ,एका सफरीत दोन गोष्टी घडल्या.






 मजेत सायकल हाकत साधारण ११.३० च्या सुमाराला थळ या अतिशय शांत  गावी पोचले. शहराच्या इतकं जवळ असून प्रगतीमुळे  आणि आधुनिकतेमुळे न बाटलेलं असं हे शांत गाव. 



नील आणि त्याच्या बाबानी इथली एक वाडी होम स्टे साठी चालवायला घेतली आहे. या वाडीत  नारळी पोफळीची सुंदर बाग आहे .








  एक  अजस्त्र अशी बांधीव विहीर 







आणि भरपूर मोठा  व्हरांडा , ऐसपैस  हॉल  आणि मोठ्या सुसज्ज  खोल्या असलेला प्रशस्त असा बंगला असं या वाडीचे रूप आहे. 




नीलला मी जेवणासाठी माश्याची फर्माईश केली होती. आणि सुखद गोष्ट म्हणजे त्यानी आणि त्याच्या बाबानी कोलंबीचं कालवण आणि हलव्याच्या तुकड्या अश्या काही चविष्ट बनवल्या की  जेवून ताटावरून उठणं जड झालं मला. 






संध्याकाळी जवळच असलेल्या बीच चा आस्वाद घेऊन आलो आणि दही भात  खाऊन मी  लवकर झोपून गेले. दुसरा दिवस लांबलचक असणार होता. 

थळ  ते श्रीवर्धन 
एक अंड पाव आणि चहा घेऊन सकाळी ६. ४५ ला थळहून निघाले .

 निघताना  नीलआणि अभि बरोबर भूभू सगुणा 
आणि माऊ सरकार स्वीटीचा निरोपही घेतला. 
















आज जवळपास १०० कि. मी. चा पल्ला गाठायचा होता.   सुरुवातीचा बराच  रस्ता साधारणपणे सपाटीचा होता . पहाट असल्याने वर्दळ तुरळक होती. 



नागाव मधून पास होताना सुक्या बाजाराची घाऊक विक्री चाललेली बघायला मिळाली. रंगीत साड्या  आणि फुलांच्या वेण्या घातलेल्या कोळणी भावाची घासाघीस करत मोठाल्या  वेताच्या टोपल्यामधली मासळी आपल्या टोपलीत,  कापडात घेत होत्या. तो क्षण मोबाईल मध्ये टिपून मी सायकलला टांग मारली. 






 कोर्लई गावाचा ब्रिज क्रॉस करून मुरुडच्या रस्त्याला लागले आणि . मध्ये मध्ये चढ उताराचा खेळ सुरु झाला.








 जाता जाता वाटेत एक पक्षी पडलेला दिसला. सायकल बाजूला लावून नीट निरीक्षण केल्यावर लक्षात आलं कि हा eurasian wryneck नावाचा हिवाळी पाहुणा  पक्षी आहे. बिचार्याचे आयुष्य कुठल्यातरी वाहनाच्या पायदळी तुडवलं गेलं होतं. थोडं उदास व्हायला झालं पण शेवटी माणसाच्या तथाकथित प्रगतीच्या अनेक बळींपैकी हा ही  एक याची जाणीव झाली आणि सुस्कारा  टाकून पुढे निघाले.  


सगळा रस्ताभर झाडाचं छप्पर रस्त्याला मिळत होतं  त्यामुळे मुरुडला पोचेपर्यंत अजिबात उन्हाचा त्रास झाला नाही.



 १०.  ४५ च्या सुमाराला  मुरुडला चमचमीत मिसळ पावची पोटपूजा करून  










आगरदांडा  बंदराकडे निघाले.  जायच्या रस्त्यावरून उजवीकडे समुद्रात  बेलागपणे उभ्या असलेल्या जंजिरा किल्ल्याच सुंदर दर्शन घडत राहिलं .





 आगरदांड्याचा जरा अलीकडे खोकरीचा  पुरातन मकबरा  दिसला.  तीन इमारतींच्या या  पुरातन मकबऱ्यामध्ये बऱ्याच सिद्दी नवाबांच्या सरदारांच्या कबरी आहेत. आणि याच  स्थापत्यही  प्रेक्षणीय आणि विलक्षण आहे.  









मकबऱ्याची लांबूनच थोडी फोटोग्राफी करून आगरदांडा जेट्टीला पोचले.  

 या जेट्टीतून जाणाऱ्या फेरीमधून चार चाकी गाड्या , अगदी बस सुद्धा प्रवास करू शकतात. मी पोचले आणि पाच दहा मिनिटात बोट आली.  बोटीत बसल्या बसल्या खुशालीचे मेसेजेस पाठवले . साधारण वीसेक  मिनिटात आम्ही पलीकडे दिघी च्या बंदराला लागलो. .







 जास्त वेळ न दवडता लगेचच मी रपेटीला सुरुवात केली. कारण वेळ वाळू सारखा निसटून जात होता. भर दुपारी १ वाजता दिघीच्या पुढच्या कॉंक्रिट च्या भगभगीत रस्त्यावरून  जाताना उन्हाची जाणीव झाली. फक्त रस्ता सुरळीत असल्याने जितका वाढवता येईल तितका वेग वाढवला. मात्र हे सुख थोडाच काळ टिकलं. काँक्रिटच्या रस्त्याच्या लक्ष्मण रेषेपुढे जुना खड्डे दरडी भरला रस्ता माझी परीक्षा घ्यायची वाट पाहत होता. 



त्यातच घाट सुरु झाला. माझा वेग चांगलाच मंदावला. एकेक वळण अधिकाधिक चढावदार होतं . 
 आणि माझ्या स्वाभिमानाची परीक्षा पाहणारा प्रसंग सुरु झाला. एक वळणदार चढाव समोर आला जिथे  रस्त्याच काम करणारी काही माणसं  रस्ता झाडत होती. 
पुढे एका बाजूला ट्रकमध्येहि त्यातली काही माणसं  बसली होती. सगळी मंडळी माझ्याकडे अचंब्याने बघत होती. 
त्यात हा जीवघेणा वळणदार चढ . त्यांच्या समोर सायकलवरून उतरलं तर इगो दुखावला असता  . सगळी शक्ती पणाला लावून  १,१ च्या गियर कॉम्बिनेशन वर सायकल दामटली आणि लागोपाठ दोन चढ पार केले.
 प्रेक्षकांसमोर मान खाली गेली नाही. 
 ट्र्क  ड्रायव्हर च्या ' बाई दमली का काय' या शेलक्या वाक्याला  काहीही गरज नसताना लगेच प्रत्युत्तर देऊन मोकळी झाले.'  एवढ्या चढावर एवढं तर होणारच ना!'  


पुढच्या एका वळणानंतर  मात्र माझा बांध सुटला. अरे हे चढ संपणारच नाहीत का? एक तर रस्त्याला इतके उबडखाबड खड्डे होते , टेमके  टेंगळ आणि खडे यातून वाट काढायची आणि अंगावर येणाऱ्या चढावरून सायकल चढवत  न्यायची . अजून एक वळण गेल्यावर  मात्र मी जोरात ओरडले ,' आ आ आ  आता  पुरे की !' ओरडून झाल्यावर मागे पुढे बघितलं , माझ्या आवाजाने कोणी भेदरलं तर नव्हतं ना! 
रस्ता खिंडीतून जात  होता , माझा आवाज मस्तच घुमला होता . चिडचिड होता होता मला हसू फुटलं . काय मॅडपणा हा. चुपचाप सायकल वरून उतरले. दोन घोट टॅंग  प्यायले. आणि सायकल ढकलत चढाच्या शेवटापर्यंत नेली.

 थोडा श्वास घेऊन परत एकदा नव्या उत्साहाने पुढे निघाले. रस्ता बरा  होण्याचं नाव घेत नव्हता . एकदाचा  उतार सुरु झाला. वेग वाढवू म्हणता शरीराला इतके धक्के बसत होते की  परत एकदा तोंडात शिव्याशाप यायला लागले. बराच रस्ता मी पेडल वर उभं राहून तोल सावरत उतरला . जरा बरा  पॅच आला कि सुळकन जायची सायकल . आणि काही वेळा थोडं वाट काढण्याचं कौशल्य वापरलं तरी जमायचं. 

अखेर दिघी घाट संपला. जिथे संपला  तिथे एकुलतं एक हॉटेल होतं . त्यांच्याकडे पुढच्या रस्त्याची चौकशी करावी म्हणून थांबले . मला दिवे आगार मार्गे समुद्राच्या जवळून जायचं होते. 

श्रीवर्धन च्या मित्रालाही फोन लागला. किंबहुना त्याचाच आला. खरं म्हणजे कोकणात बहुसंख्य भागात फोनच नेटवर्क नीट नाही. पण इथे अगदी मोक्याच्या जागी नीट संपर्क झाला. त्याने रस्ता समजावला  आणि सकाळपासून अनेकदा विचारलेला मेसेज वरचा प्रश्न परत विचारला. 'घ्यायला येऊ का.' मला परत हसू फुटलं. 

 झालं होत असं कि आजच्या या लांबच्या रपेटीसाठी मी बॅक अप प्लॅन तयार ठेवला होता. मित्राला सांगून ठेवलं होतं , मी जर वाटेत दमले आणि तुला फोन केला तर सरळ  गाडी काढायची मला घ्यायला यायचं. त्या वर तो आगाऊ सकाळपासून च्या माझ्या प्रत्येक अपडेट नंतर मला मेसेज करत होता . 'घ्यायला येऊ?' 
हे असे माझे मित्र . मैत्रिणीच्या कर्तृत्वावर एवढा अविश्वास चांगला मित्रच दाखवू शकतो बहुतेक. 

तर मित्राच्या फोन संवादातला रस्ता समजावण्याचा भाग उरकला आणि तो मला विचारता झाला , मग आम्ही जेवून घेऊ ना? तुला अजून खूप वेळ लागणार. घड्याळात पाहिलं तेंव्हा २ वाजून गेले होते. मी त्याला हो सांगितलं आणि हॉटेलात एक स्प्राईट मागवलं. खाण्याची अजिबात इच्छा नव्हती. सोबत घेतलेले खजूर आणि मूठभर शेंगदाणे तोंडात टाकले. 
आता दुपारचं ऊन परिणाम करायला लागलं. नशिबाने पुढचा बराच रस्ता खड्डेविरहित होता. अगदी दिवे आगर पार करून पुढे भरडखोल  च्या रस्त्याला लागेपर्यंत .  

दिवे आगर ला जाताना वाटेत मला अजून एक नवलाईचा पक्षी मिळाला. Montague's harrier .

लांबूनच त्याची भरारी बघत होते आणि सायकलचा वेग वाढवून त्याच्या योग्य रेषेत यायचा प्रयत्न करत होते . पाऊच मधून कॅमेरा काढून फोटो घेईपर्यंत तो सूर्याच्या रेषेत गेला आणि फोटोत काळी आकृती आली . थोडी वाट बघून परत नेम धरला कारण हॅरियर घिरट्या घालत होता. आता मात्र ओळख पटू शकेल इतपत बरा फोटो मिळाला. 






 दिवे आगर आलं आणि गावामधून जाताना दुतर्फा असलेल्या होम स्टेच्या संख्येने  मी अवाक झाले. अक्षरशः प्रत्येक घर हॉटेल होते. हे असं बाजारीकरण कधी झालं? एवढे पर्यटक येतात ? नवलच होते.

आता अजून एक घाट आला . रस्त्याची अवस्था परत तशीच उबडखाबड. . मला समुद्र दिसायची ओढ लागली होती आणि इथे रस्ता मात्र वर वरच चालला होता . मनातल्या मनात सायकलिंगची ही  आगाऊ खाज पूर्ण  करणाऱ्या स्वतःला नाव ठेवत होते. कोणी सांगितलं होते तड्फडायला. झेपत नसेल तर गप बसावं घरी. मी रस्ता चुकले तर नाहीय ना? मग डोंगरात आत आत कुठे चाललंय हा रस्ता?  एक ना अनेक  विचार नुसते भराभर थैमान घालत होते . एकीकडे शरीर त्याचे  चाकांची गती कायम ठेवण्याचं काम मात्र चोख करत होते. 

आणि हुश्श  एका खिंडीनंतर मात्र पलीकडे समुद्राची भेट घडली. रस्त्याचे चढ बरोबर लगेचच उतार  घेऊन यायला लागले.


 नैसर्दिक बंदर कसं  असतं  हे मला भरडखोल ला बघायला मिळालं. समुद्राच्या काठाजवळची  खडकाळ जमीन मधेच दुभंगली होती आणि काठाकडे असणाऱ्या जलाशयात येण्याजाण्याचा एक पाण्याचा मार्ग तयार झाला होता. मी उंचावर असल्याने हि भौगोलिक रचना सुस्पष्ट कळत होती. बोटींची ये जा एवढ्या उंचावरून मजेदार वाटत होती. 


एका ठिकाणी रस्त्याच्या पातळीवर लांबवर पसरलेला सागर आला. चटकन सायकल छानश्या झाडाशेजारी उभी  केली आणि अथांग पसरलेल्या समुद्राच्या  पार्श्वभूमीवर माझ्या या कणखर सुंदरीच सुंदर चित्र टिपलं.
 


थोडं पुढे गेल्यावर  वडाच्या डेरेदार सावलीखालचा एक  बांध बघून थोडी टेकले. पाय लांब पसरून पाणी , टँग  पीत चांगली १० मिनिटे विश्रांती घेतली.  थोडे चणे शेंगदाणे पोटात ढकलले . आता दिवसाचा तिसरा प्रहर सुरु होत होता. लवकरच सूर्य मावळतीला येणार होता. मला अंधार पडायच्या आत श्रीवर्धन गाठायचे होते. पण ऊन आणि दिवसभराचे श्रम यामुळे माझी शक्ती लवकर लवकर संपत होती. 


 सुखाची एक गोष्ट म्हणजे उजव्या बाजूला समुद्राची पुळण सतत साथ करत होती . आणि  पाणी कलत्या उन्हात प्रखर चमकत होत तरीही सुंदरच वाटत होत. 










अजून थोड्या चढ उतार झोक्यांनंतर एक नारळपाणीवाला सापडला. परत एकदा विश्रांती ब्रेक घेतला आणि  मनसोक्त नारळपाणी पीत बसले. 


 तेवढ्यात आकाशात लक्ष गेलं. एक समुद्र गरुड white bellied sea eagle माझ्या समोर आडव्या पसरलेल्या टेकडीच्या  एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे तरंगत येताना दिसला. तत्क्षणी हातातलं शहाळं  खाली ठेवून सायकल कडे धावले. पाऊच मधून कॅमेरा काढला आणि झटक्यात गरुडाकडे रोखला. त्याच राजबिंडं रूप कॅमेऱ्यात साठवलं आणि मला आनंदच उधाण आलं. हे असं शारीरिक कष्टाच्या छंदाच्या  वेगळ्या मिशन वर असताना दुसरा छंद ही पुरवता येणं  यासारखी धमाल नाही. 



आता किलोमीटर म्हटलं तर फार राहिले नव्हते . अवघे ८ किलोमीटर राहिले होते. फक्त ते पार करण्यासाठी अजून एक सत्व परीक्षा पार पडायची होती. एका ठिकाणी लक्षात आलं कि आपल्या समोर तर एक डोंगररांग येत चाललीय. हि पार करावी  लागणार. तितक्यात मित्राचा फोन आला. तो म्हणे अजून कशी नाही पोचलीस ? म्हटलं तीन कि मी दाखवतंय आता. तो म्हणे  म्हणजे घाट आला असणार . म्हटलं हो.  चला लाव जोर. आपलं इच्छित ठिकाण इतक्या सहजी पदरी पडणार थोडंच? 

मग काय लागले शक्ती गोळा करून पेडल हाकायला. चांगला दिड  दोन कि मी चढ चढल्यावर शेवट एकदाचा उतार आला आणि पुढच्या १० मिनिटात श्रीवर्धन शहरात प्रवेश करती  झाले. माझ्या मित्राचे घरासमोरच  मेडिकल स्टोर आहे . अर्थात ही  काही त्याची खरी ओळख नाही. त्यांच्या कुटुंबाचा सुपारीचा पिढीजात धंदा आहे. जुने नावाजलेलं नाव आहे इथे त्यांचं. 

तर चुन्याच्या भक्कम भिंती,  सागवानी तुळया आणि खांब असलेल्या  शंभर  एक वर्ष जुन्या अश्या त्यांच्या घराच्या अंगणात सायकल वळवली आणि एक मोठा पल्ला गाठल्याचा आनंद झाला. 










स्वागताला तो,  त्याची बायको हजर होते. यापुढची संध्याकाळ आणि दुसरा दिवस मी त्यांच्या ताब्यात असणार होते. घरात असणारे  चार वयोवृद्ध,   मित्राची दोन मुलं आणि हि दोघे असा मोठा राबता घरात होता. पण माझ्यासाठी हे घर नवख नसल्याने दोन दिवस कसे सरले समजलंच नाही.

पोचल्याबरोबर  संध्याकाळी कढत पाण्यानी अंघोळ आणि गरमागरम चहा झाला. रात्री श्रमपरिहार आणि माझ्यासाठी खास  बाहेरून मागवलेलं  चविष्ट चिकन . दुसऱ्या दिवशी मस्त बडबड्या मोकळ्या अश्या दोन्ही मुलांबरोबर त्यांच्या कुलदैवताला भेट .







मग खाण्याचा वार असल्याने  खास पद्धतीने बनलेले परमेश्वराच्या प्रथमावताराचे अनेकविध प्रकार .नंतर पर्यायाने आलेली झोप . 















 गेले १० महिने कोरोनाच्या संकटामुळे मुलांच्या बाबाने म्हणजे माझ्या मित्राने कोणालाही घराबाहेर पडू दिले नव्हते.  घराच्या आत राहायला आलेली मीच पहिली बाहेरची.  बाहेर हॉटेल मध्ये जेवायला जाणे तर दूरच. आज ती संधी  माझ्या मदतीने साधावी असं मुलं  आणि मित्राच्या बायकोनी ठरवलं. 

त्याप्रमाणे मी विषय काढला. आईला कुठलं हॉटेल आवडत हे मुलांना माहित होते पण बाबाचं  मन  वळवणे  माझ्यावर सोपवलं होते. मित्रानी भलतंच हॉटेल सुचवलं आणि  लगेच तिकडे फोन लावला ,
 २5 डिसेम्बर , सगळं श्रीवर्धन पर्यटकांनी गजबजलेलं. दारू मिळणाऱ्या ठिकाणी तोबा गर्दी असणार हे उघड होते.  तो म्हणे नाही आज फार गर्दी आहे तिथे. नको जायला. 

बायको म्हणे 'पण आपण बाहेर जेवणार म्हणून मी जेवण बनवलच नाही'. मग  मी म्हणे ,' अरे मला दारू नकोय , ते सी विंड हॉटेल चांगलं आहे का?' त्यावर मग तिकडे एकदा चौकशी करून आम्ही सगळे मस्त नटून तयार होऊन हॉटेल मध्ये जेवायला गेलो. .

 मला आज लवकर आडवं होणं खरतर आवश्यक होत . दुसऱ्या दिवशी शेवटचा टप्पा गाठायचा होता आणि तिथे मला दोन पक्षी मित्र दुपारी भेटणार असल्याने वेळेचं बंधन होते. पण पोरांना जेवणांनंतर बीचवर जायची इच्छा झाली . रात्रीच्या शांत वातावरणात सगळेजण थोडा वेळ समुद्राचा खारा वारा  खात  समुद्राची गाज ऐकत उभे राहिलो . आज दिवसभर मित्राच्या दोन्ही मुलांबरोबर वेळ इतका मस्त गेला होता की  त्यांच्या एकमेकांना चिडवण्याच्या युक्त्यांमध्ये मी ही  सामील झाले आणि हसत खिदळत आम्ही घरी पोचलो. अतिशय प्रसन्न आणि दिलखुलास असं हे कुटुंब जणू माझंच झालं होतं. 


श्रीवर्धन दापोली / केळशी  
२६ तारखेला पहाटे ७ च्या जरा आधी श्रीवर्धन सोडलं.














आज दापोलीपर्यंत ६३ कि मी चा  पल्ला जेवणाच्या वेळपर्यंत गाठायचा होता. सायकल सफरीमध्ये  कोकणातल्या  अंतराचा विचार करताना चढ उतारांचा मुद्दा महत्वाचा ठरतो . पहिल्या दिवशी बहुतेक रस्ता सपाटीचा होता . दुसऱ्या दिवशी काही भाग घाट आणि काही सपाट रस्तेही होते. आज निवडलेला मार्ग भरपूर चढ उतारांचा असणार होता. 

   श्रीवर्धन हुन बागमांडला जेट्टीला जाण्यासाठी हरिहरेश्वर गाठावं लागतं  . थोडे किलोमीटर कमी करण्यासाठी कोलमण्डला वरून  जायचा सल्ला मित्राने दिला होता. 
कोलमंडलाला पोचण्यासाठी सुद्धा परत एक डोंगर रंग पार करायची होती. सकाळच्या छान स्वच्छ हवेत चढ त्रासदायक वाटत  नव्हता. आजूबाजूला मस्त जंगल आणि अनेकविध पक्ष्यांचे आवाज आणि हालचाली जाणवत होत्या. 
 पांढऱ्या पोटाचा कोतवाल , शिक्रा , हळद्या jerdons leafbird दिसले. एका ठिकाणी मोर सुद्धा दिसले. सिमीटर बॅबलरचा गूढ असा आवाज आसमंत भरून टाकत होता. 





 











आसमंताचा पुरेपूर आस्वाद घेत कोलमांडला जेट्टी गाठली. घाटाच्या उतारावरूनच बोट लागलेली दिसली पण उगीच तारांबळ न करता माझ्या आटोक्यातल्या वेगात सायकल चालवत जेट्टीवर पोचले.

 राईड सुरु झाल्यापासून स्वतःचा पूर्ण फोटो सायकलिंग च्या वेशात काढून घ्यायचं सुचलं नव्हतं तो  एका पर्यटकाकडून काढून घेतला . 











या सगळ्या सफारी मध्ये जागोजागी मला लोक भेटत ते एक प्रश्न हमखास विचारत. कुठून आलात? मी म्हणे तशी नवी मुंबईहून आणि आज अमक्या ठिकाणाहून . अर्थातच लोकांना गम्मत वाटे. काही जणांनी आठवडा लागला का असे हि विचारले. आत्तासुद्धा काही चौकस पर्यटकांनी हे विचारून घेतले. 

रस्त्यात जेंव्हा एखादी गाडी किंवा बाईक पास होई तेंव्हा कधी चालक हात वर करून दाद देत , कधी गुड मॉर्निग वगैरे म्हणत आणि बहुतेकदा हॉर्न वाजवत. त्या हॉर्नचा उद्देश दाद देणे किंवा ग्रीट करणे आहे हे तेंव्हा लक्षात आलं जेंव्हा हॉर्न वाजवणाऱ्याच्या चेहऱ्याकडे माझं  लक्ष गेलं. त्यावर चिडवणं किंवा बाजूला व्हा सांगणं नसे तर कौतुकमिश्रित हास्य दिसे. सुरुवातीला हॉर्न ऐकून होणारी माझी चिडचिड या जाणीवेनंतर गायब झाली. 


तर सांगत काय होते, कोलमांडला . पलीकडे बाणकोट. सावित्री नदी आपण इथे पार करतो. हि खाडी ओलांडली कि एक रस्ता वेळास कडे जातो आणि दुसरा मंडणगड किंवा केळशी कडे. इथपर्यंत माझे वेळापत्रक बरे जमले  होते.
 बाणकोट ला परत चढ सुरु झाला. तो पार केळशी फाटा येईपर्यंत. केळशी फाट्याला आले तेंव्हा जवळपास १०. ३० झाले होते. मला आश्चर्य वाटलं. अरेच्चा हे तर चुकतंय. अजून जवळपास ४० कि मी बाकी होते . ते ही  खडतर वाटेने . तीन तासात कसे गाठणार आपण. पण आधी पोटपूजा आवश्यक होती. तेंव्हा फाट्यावरच्या एकुलत्या एका हॉटेलात गेले. वडा,  मिसळ काय मागवावे हा विचार करताना अंडा  भुर्जीच चित्र दिसलं . त्याला विचारलं भुर्जी मिळेल का . होकारार्थी उत्तर आलं.

 चहाचे घोट घेत मी हॉटेलच्या वेटरकडे रस्त्याची चौकशी केली. तो म्हणे मंडणगड च्या रस्त्याने लांब पडेल दापोली,  मंडणगडच्या आधी एक फाटाही  दापोलीला जातो पण तो पूर्ण निर्मनुष्य असेल , तुम्हाला गरजेला माणूस भेटणार नाही.  तुम्ही केळशी मार्गानेच  जा. स्थानिक माणसाचा सल्ला ऐकून नाश्ता संपवून मी केळशीच्या रस्त्याला लागले.  केळशीच्या आधी एक रस्ता मांडवली ब्रिज वरून दापोली कडे जातो तिथून जावे असा विचार केला. 

फाट्यावरून अर्धा कि मी.  पासून सुसाट उतार सुरु झाला. रस्ता गुळगुळीत होता. आजूबाजूला वनराई होती. आणि रस्त्याला अगदीच तुरळक वाहने. खाली खाली घरंगळत जायला जी काही मजा आलीय की  विचारता सोय नाही. मधेच एकदा विचार डोकावला ,ही  वाट परत  चढून जायची वेळ आली तर? अशक्य अश्या त्या कल्पनेनी शहारा आला  आणि तो विचार झटकून मी खाली घरंगळत सुटले. उताराच्या शेवटी  फाटा आला. 

कोणाला तरी विचारावे म्हणून थांबले तो पर्यंत दोन तीन स्कुटर बाईक वाले आलेच. सर्वानुमते केळशी बायपास रस्ता अतिशय खराब आणि निर्मनुष्य आहे तेंव्हा केळशीत  जाऊनच दापोली गाठा. फार विचार न करता केळशीच्या दिशेने रपेट मारली. आता वेळाशी  शर्यत सुरु झाली होती. रस्ता झकास होता .

 एकीकडे रस्त्याचा आनंद घेत आणि दुसरीकडे कधी पोचू ? किती वेळ लागेल असा विचार करत  केळशीत पोचले.

 




आम्हा लागूंची कुलदेवी केळशीची महालक्ष्मी . तिच्या उत्सवाच्या निमित्ताने एक दोनदा आणि गोवा कोस्टल सायकल सफरी निम्मित एकदा असं केळशीला  तीनेक वेळा येणं  झालं होतं. आज मात्र  अजेंडा मध्ये देवदर्शन अजिबात नव्हतं आणि तेवढा वेळ ही नव्हता. दीड वाजेपर्यंत दापोली गाठायचं होतं वाजले होते पावणे बारा . २५ कि मी अंतर बाकी होते . चढ उतार लक्षात घेता दापोली गाठायला संध्याकाळ झाली असती. मी व्यावहारिक निर्णय घेतला. सायकल सफरीला केळशीतच दि  एन्ड करायचं . 

कारणे दोन-   एक म्हणजे . आज हवा चांगलीच बदलली होती . हवेतला उष्मा एकदम वाढला होता . पुढचा सगळा  मार्ग चढाचा कारण केळशी समुद्र किनारी आणि दापोली थंड हवेच ठिकाण . माझी तुफान दमछाक झाली असती.
दुसरं कारण  माझ्यासाठी दोन पक्षीमित्र खोळंबून राहिले असते. 

मुळात आनंदासाठी सफर होती . स्वतःला विनाकारण अडचणीत टाकायची काहीच गरज नव्हती. नाक्यावर सामान नेणारे रिक्षा टेम्पो असतात त्यापैकी एकाला बुक केलं. सायकल हौद्यात नीट बांधली आणि चालकाच्या बाजूला असलेल्या चिंचोळ्या जागेत बसून दणादण धक्के खात बरोब्बर दीड वाजता  दापोलीला पोचले. 
एका नव्या प्रकारच्या पर्यटनाची माझी मीच करून  घेतलेली ही  ओळख होती. थोडं काही मोजून मापून , थोडं काही अनपेक्षित असं सगळं वाट्याला आलं. आणि आणखी मोठ्या वेगळ्या वाटा शोधायला मिळणारे  हे दालन मला खुलं झालं. 



- जुई